माझा जन्म शेतकरी कुटुंबातला. माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कवठे यमाई या गावात झाले. उच्च माध्यमिक शिक्षण धामणी येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी महाविद्यालयात झाले. 12 वीत महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून बीएएमएस पदवी मिळवली. या काळात पुण्यातील विद्यार्थी सहाय्यक समिती या संस्थेत एक वर्ष व जेष्ठ वैद्य गुरुवर्य निर्मलाताई राजवाडे यांच्याकडे 5 वर्षे वास्तव्य केले. गुरुवर्य अविनाश लेले यांच्याकडे आयुर्वेदाचे धडे घेतले. इंटरनॅशनल अॅकॅडमी आँफ आयुर्वेद या संस्थेचा सचिव म्हणून 5 वर्षे काम पाहिले.
आयुर्वेद हे शास्त्र गुरुशिवाय समजणे अवघड आहे. वैद्य लेले यांच्याकडे मी आयुर्वेदच्या पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंत शिकलो. मॉडर्न प्रॅक्टीस करायची हेच डोक्यात होते. कारण माझा एमबीबीएसचा नंबर अवघ्या एका मार्काने गेला होता. त्यामुळे बीएएमएस करून स्वतःचे हॉस्पिटल सुरू करायचे, असे मनात होते. पण वैद्य लेले यांच्यामुळे आयुर्वेदाकडे वळलो. निर्मलाताई राजवाडे यांच्याकडे राहायला असल्यामुळे आयुर्वेदाविषयी सतत काही ना काही कानावर पडायचे. आयुर्वेदाचे ग्रंथ आपण वाचू शकतो; पण त्याचा नेमका अर्थ जाणून घ्यायचा, तर योग्य गुरूची आवश्यकता असते. ग्रामीण भागातील लोकांना योग्य आणि किफायतशीर उपचारांची आवश्यकता असते. त्यामुळे ग्रामीण भागात काम करायचे मी ठरवले होते. त्यानुसार 2004 पासून जीवनधारा आयुर्वेद रुग्णालय हे स्वतःचे आयुर्वेदिक रुग्णालय शिरूरमध्ये चालवत आहे. सुरवातीला लोकांचा दृष्टीकोन वेगळा होता. या भागात आयुर्वेदाबाबत फार माहिती नव्हती. या डॉक्टरचा गुण येईल की नाही, असे लोकांना वाटत असे. तसेच आयुर्वेदाच्या औषधाने गुण यायला खूप वेळ लागतो, असेही मत या भागातल्या लोकांच्या डोक्यात ऐकून पक्के झालेले होते. त्यातच एखाद्या सांधेदुखीच्या पेशंटला ‘बस्ती करून घ्या,’ असे सांगितले की तो आश्चर्याने बघायचा. मला सांधेदुखी आहे आणि हे डॉक्टर संडासच्या जागेत औषध घालायचे म्हणतात, ही कल्पना त्याला विचित्र वाटत असे. त्यामुळे आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध माहिती सामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी जीवनधारा आयुर्वेद फाउंडेशनची स्थापना मी केली. व्याख्याने, जीवनधारा दिवाळी विशेषांक अशा उपक्रमांतून लोकांमध्ये याविषयी साक्षरता निर्माण झाली. जीवनधारा आयुर्वेद फाउंडेशनचा अध्यक्ष या नात्याने ग्रामीण भागात शास्त्रीय आयुर्वेद पोहचवण्याचे काम गेली 15 वर्षे करत आहे. या प्रयत्नांमुळे आजघडीला शिरूरमध्ये आयुर्वेद म्हणजे घोडे डॉक्टर असे समीकरण बनले आहे. आतापर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वीरीत्या आयुर्वेदीक उपचार केले आहेत.
केशायुर्वेदविषयी वैद्य पाटणकरांच्या फेसबुक पोस्टवरुन समजले. संकल्पना कन्सेप्ट आवडली व केशायुर्वेदला जोडला गेलो. केशायुर्वेदच्या माध्यमातून केसांच्या पेशंटची संख्या खूप वाढली. ही एक वेगळी संकल्पना आहे. यामध्ये आपल्याला पेशंटला काही गोष्टी प्रत्यक्ष दाखवता येतात. उदा. स्काल्प अॅनालिसीस, स्काल्प फोटोग्राफी याद्वारे केसांमध्ये किती फरक पडला हे पेशंटला थेट दिसते, ते त्यांना जास्त अपील होते. यापूर्वीही मी पेशंटना केसांची ट्रीटमेंट द्यायचो. परंतु केशायुर्वेद घेतल्यानंतर परिणाम वेगाने दिसू लागला. पेशंटचे समाधान होऊ लागले.
केशायुर्वेदचे अनेक समाधानी पेशंट आहेत. एक पेशंट ट्रीटमेंटसाठी आला. काही दिवस ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याला जो फरक अनुभवायला मिळाला तो इतका मस्त होता की तो खूपच आनंदी झाला. डॉक्टर मला नेमके हेच पाहिजे होते, असे म्हणत त्याने माझे अनेकवेळा आभार मानले.
केशायुर्वेदच्या पेशंटच्या केस स्टडीज, उपचारापूर्वी व नंतरचे फोटो, डाटा कलेक्शन हे सगळे संकलित केले जाते. त्यातून संशोधनाला फायदा होतो. ही केशायुर्वेदची उत्तम सिस्टीमच आहे. त्यामुळे सतत नवनवीन कल्पना, उपचारपद्धती आणि औषधांची माहिती आम्हाला होते.
केशायुर्वेदविषयी या ग्रामीण भागात प्रचार-प्रसाराला भरपूर वाव आहे. त्यामुळे फेसबुकवर वेगवेगळ्या पोस्ट, लेख, हॅशटॅग, संवादवाहिनी या स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात अशा अनेक गोष्टी मी करत असतो. कारण इतकी प्रभावी उपचारप्रणाली लोकांपर्यंत पोचावी ही काळाची गरज आहे, असे मला वाटते.
आयुर्वेदात केस हा अस्थिधातूचा मल किंवा उपधातू मानला गेला आहे. शरीरातला इतका छोटा घटक असूनही त्याचा सविस्तर अभ्यास केशायुर्वेदात केलेला आहे. परंतु मल असला तरी मलाच्या विश्लेषणावरून शरीरातील मुख्य द्रव्यांची रचना समजू शकते. तसेच यातून प्रकृतीचाही अंदाज बांधता येऊ शकतो. इतकेच नव्हे, तर यावरील उपचारांचा इतर अनेक छोट्या-मोठ्या व्याधींच्या निराकरणासाठी उपयोग होतो. त्यामुळे केशायुर्वेदशी जोडलो गेल्यापासून मला आयुर्वेदाच्या अभ्यासाची वेगळी दिशा मिळाली.
केशायुर्वेदची ही चळवळ वैद्य पाटणकर अत्यंत धडाडीने पुढे नेत आहेत. त्यांचे वक्तृत्त्व, संघटन कौशल्य यामुळे अनेक डॉक्टर, वैद्य या चळवळीशी जोडून घेत आहेत. पेशंटला थेट फायदा होत असल्यामुळे ते समाधानी होतात आणि त्यातून पेशंट-डॉक्टर यांच्यात एक विश्वासाचे नाते निर्माण होत आहे, हे या चळवळीचे सर्वात मोठे फलित आहे, असे मला वाटते. ही चळवळ नजीकच्या भविष्यात नक्कीच संपूर्ण देश व्यापेल, अशी आशा मला वाटते.
केशायुर्वेदतर्फे मागीलवर्षी मला नेदरलँड येथील जागतिक परिषदेत प्रबंध सादर करण्याची संधी मिळाली. या निमित्ताने परदेशात आयुर्वेदाचे कार्य कसे चालते हे पाहाण्याची आणि त्याचा प्रचार-प्रसार करण्याची संधीही मिळाली. कवठे यमाईसारख्या अत्यंत छोट्या गावातून आलेल्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला मोठी ओळख देण्यात दोन गोष्टींचा महत्त्वाचा वाटा आहे. त्या दोन गोष्टी म्हणजे आयुर्वेद आणि केशायुर्वेद. आयुर्वेदाने आईच्या मायेने आत्मविश्वासाची निर्मिती केली, तर केशायुर्वेदाने बापाच्या प्रेमाने स्वतःच्या पायावर उभे राहण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली. या दोन्हींची सांगड घालून मी आज माझे जीवन समाधानाने व्यतीत करत आहे. या दोन्हींचेही ऋण कधीही न फेडण्यासारखे आहेत. क्लिनीकमध्ये असणारी गर्दी आणि त्याहूनही रुग्णाच्या चेहर्यावरचे हास्य, समाधान हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. तो प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देणार्या केशायुर्वेदचे अनंत आभार!